लखनऊ येथे होणाऱ्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील २० युवक रवाना

133

गडचिरोली, दि. २४ (जि.मा.का.) : मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) व केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम लखनऊ, उत्तर प्रदेश येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील २० आदिवासी युवकांची तुकडी आज गडचिरोली येथून रवाना करण्यात आली.

केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक मा. श्री. अजयकुमार शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून युवकांना लखनऊकडे रवाना केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, या युवकांनी कार्यक्रमातून काही नवीन गोष्टी आत्मसात करून आपल्या जिल्ह्याची वैशिष्ट्ये देशभरात मांडावीत व गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी श्री. सारंग मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत पाटील यांनी केले.

या प्रसंगी डिप्युटी कमांडंट श्रीमती चंचल परवाना, जिल्हा युवा अधिकारी श्री. सारंग मेश्राम, श्री. मंगेश दूबे, सौ. कल्याणी गायकवाड तसेच श्री. हिमांशू पेद्दीवार व सौ. गौरी सेलोटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवकांना मिळालेली ही संधी त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देणारी ठरणार असून राष्ट्रीय पातळीवर त्यांची क्षमता आणि कौशल्य प्रदर्शित करण्यास हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.