प्रतिनिधी//
एटापल्ली: तालुक्यातील महत्वाचे केंद्र असलेल्या एटापल्ली येथे मागील काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या नेटवर्क सेवेत मोठा व्यत्यय येत आहे. यामुळे येथील नागरिक,
विशेषतः दूरदूरहून येणाऱ्या आदिवासी बांधवांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. बँकेची कामे तसेच इतर शासकीय व खासगी ऑनलाईन कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना नेटवर्क नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील दुर्गम भागातून, जवळपास 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास करून अनेक आदिवासी बांधव आपल्या कामांसाठी एटापल्ली येथे येतात. मात्र, BSNL ची नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याने त्यांची महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत एटापल्ली नगरपंचायतीचे नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार आणि राहुल कुळमेथे यांनी तात्काळ कार्यवाही करत BSNL च्या मुख्य व्यवस्थापकांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी नागरिकांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने BSNL नेटवर्क सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
आता BSNL प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन एटापल्लीतील नेटवर्क समस्या कधी दूर करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.