गडचिरोलीत अवैध उत्खनन प्रकरणात कारवाई न झाल्याने कावळे दाम्पत्याचे आज पासून आमरण उपोषण

68

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गूज्जलवार
*गडचिरोली:*एटापल्ली कसनसुर वनपरिक्षेत्रात झालेल्या अवैध उत्खननाच्या प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यामुळे गडचिरोलीतील समाजसेवक मुकेश वामन कावळे आणि त्यांची पत्नी गीता मुकेश कावळे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. मुख्य वनसंरक्षक कार्यालय, गडचिरोली येथे 10 ऑक्टोबरपासून हे उपोषण सुरू होणार आहे. वन विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध करत हे पाऊल उचलण्यात आल्याचे कावळे दाम्पत्याने स्पष्ट केले आहे.

कसनसुर वनपरिक्षेत्रात अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार 25 एप्रिल 2023 रोजी करण्यात आली होती. या तक्रारीनंतर वनसंरक्षकांनी चौकशी अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये काही अधिकारी दोषी ठरले होते. मात्र, या अहवालावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत कावळे दाम्पत्याने उपोषणाची घोषणा केली आहे.

यासंदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांना दोषींवर कारवाई करण्याबाबत तीन वेळा स्मरणपत्रे पाठवली आहेत. तसेच, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनीही स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, या सर्व आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने कावळे दाम्पत्याला उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला आहे.

अवैध उत्खननाच्या प्रकरणात वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे, दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर

कोणतीही कारवाई झाली नाही. चौकशी अहवालात दोषी ठरलेल्या चार वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असले तरी, मुख्य आरोपी कंत्राटदारांवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.

मुकेश वामन कावळे यांनी या संपूर्ण प्रकरणात वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप केला आहे. “अनेक अहवाल आणि तक्रारी असूनही दोषींवर कारवाई होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आम्ही न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करू आणि उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेऊ,” असे कावळे म्हणाले.

कावळे दाम्पत्याच्या या उपोषणामुळे गडचिरोलीतील प्रशासनावर दबाव येण्याची शक्यता आहे. जर वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते, असा इशारा कावळे दाम्पत्याने दिला आहे.