अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली: ग्रामपंचायत गटटा अंतर्गत येणाऱ्या धुळेपलली गावात अनेक महिन्यांपासून वीज नसल्यामुळे नागरिकांना अंधारात जीवन जगावे लागत होते. या गंभीर समस्येमुळे गावातील नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) कडे मदत मागितली होती. त्यानंतर भाकपाने या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत अखेर गावात वीजपुरवठा सुरू करून दिला.
वीज नसल्यामुळे गावातील नागरिक, युवक, महिला व विद्यार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागत होता, महिलांना घरगुती कामे करताना अडचणी येत होत्या, तर युवकांच्या रोजगारावर व दैनंदिन जीवनावर परिणाम होत होता. उष्णतेच्या दिवसांत लहान मुले व वृद्धांना विशेष त्रास सहन करावा लागत होता.
या प्रश्नासाठी भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार व जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर धुळेपलली गावात वीज पोहोचली आहे.
वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे गावातील अनेक समस्या दूर झाल्या असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार यांचे मत:”धुळेपलली (ग्रामपंचायत गटटा) गावातील वीजप्रश्न हा केवळ सुविधा नव्हता, तर नागरिकांच्या जगण्याचा मूलभूत प्रश्न होता. गावातील नागरिकांनी भाकपा कडे विश्वासाने मदत मागितली आणि आम्ही तो विश्वास सार्थ ठरवला. आम्ही दिलेला शब्द पूर्ण केला, ही जनतेच्या एकजुटीची जीत आहे. पुढेही अशाच प्रश्नांसाठी संघर्ष सुरू राहील.”







