आम्हच्या गावात रस्ता कधी होणार जी “रस्त्याविना गाव, आरोग्य-शिक्षण संकटात – गोटाटोल्याची वेदना प्रशासनाच्या कानावर?”

156

प्रतिनिधी//

जारा्वङी: स्वातंत्र्याची साडेसात दशके उलटून गेली असली तरी अद्याप भारतात अशी अनेक गावे आहेत, जिथे विकास पोहोचलाच नाही. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात वसलेले गोटाटोला हे गाव त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. सरखेडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या या गावाला आजही पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, रस्त्यांच्या अनास्थेमुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे “आमच्या गावात रस्ता कधी होणार?” असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विचारला आहे.

सरखेडा ग्रामपंचायतीच्या पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर, नदीच्या किनारी घनदाट जंगलात वसलेले गोटाटोला हे एक छोटं आदिवासी गाव आहे. या गावात सुमारे २९ कुटुंबे राहतात, ज्यांची लोकसंख्या १५० च्या वर आहे. पण पक्क्या रस्त्याचा अभाव आणि अवघड पायवाट यामुळे येथील लोकांना जंगलातून तीन किलोमीटर चालून प्रवास करावा लागतो. आजही गावात पोहोचण्यासाठी वाहनाचा मार्ग उपलब्ध नाही, ज्यामुळे स्थानिक नागरिकांची फरफट होत आहे.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दररोज खडतर जंगलातील पायवाटेने सरखेडा गावात जावे लागते. आरोग्य सेवाही अत्यंत दुर्गम आहेत. आजारी व्यक्तींना वैद्यकीय उपचारांसाठी सहा किलोमीटर दूर जारावंडी गावातील दवाखान्यात न्यावे लागते. तोही प्रवास बैलगाडी किंवा सायकलच्या मदतीने करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत हा मार्ग किती कठीण ठरतो, हे गावकऱ्यांनी अनेकदा अनुभवले आहे.

गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून शासन, प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधींकडे आपल्या समस्यांची व्यथा मांडली आहे. मात्र, कोणत्याही पातळीवरून दखल घेतली गेली नाही. दरम्यान, अनेक ठिकाणी गरज नसलेल्या ठिकाणी रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यांच्यामते, विकासाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी होत असताना गोटाटोल्यासारख्या गावांकडे दुर्लक्ष होत आहे, हे दुर्दैवी आहे.

*ग्रामस्थांची मागणी*

गावातील नागरिकांनी शासनाला विनंती केली आहे की, गोटाटोला गावाचा विकास करण्यासाठी प्राथमिकता दिली जावी. रस्ते बांधण्याचे काम त्वरित सुरू करून गावातील मूलभूत सुविधा उभाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

“गोटाटोला हे दुर्गम भागातलं एक आदिवासी गाव आहे. रस्ता नसल्यामुळे शाळा, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांपासून आम्ही वंचित आहोत. कित्येकदा लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली, पण काहीही उपयोग झाला नाही. आम्ही अजून किती वर्षं रस्त्यासाठी वाट बघायची?” अशी संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

*शासनाच्या त्वरित हस्तक्षेपाची गरज*

स्मार्ट सिटी आणि बुलेट ट्रेनच्या स्वप्नांनी नटलेल्या देशात, अजूनही गोटाटोल्यासारखी गावे रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत, ही मोठी शोकांतिका आहे. शासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन गोटाटोला गावातील रस्त्यासह इतर पायाभूत सुविधांचा विकास साधावा, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

_”सदर रस्त्याच्या स्थितीबाबत मी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कळवितो. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, याची योग्य ती दक्षता घेतली जाईल.”_

*– नमन गोयल*
*उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एटापल्ली*