गडचिरोली (जिमाका) दि. २८ : एटापल्ली तालुक्यातील मशरूम उत्पादन प्रकल्पाबाबत “प्रकल्प बंद” असल्याच्या अफवांना पूर्णविराम देत, हा प्रकल्प नियोजनबद्ध आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. उलट, पहिल्याच टप्प्यात यशस्वी उत्पादन घेत या प्रकल्पाने बाजारपेठेत ठोस ओळख निर्माण केली असून, पुढील उत्पादन टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.
मशरूम उत्पादन ही अत्यंत संवेदनशील आणि वैज्ञानिक पद्धतीने केली जाणारी शेती असून, नियमित तांत्रिक प्रक्रियेनुसार पुढील बॅचसाठी तयारी सुरू आहे. उत्पादन कक्षांचे निर्जंतुकीकरण, नवीन सबस्ट्रेट व स्पॉनची तयारी तसेच तापमान व आर्द्रतेचे व्यवस्थापन यांसारख्या प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे प्रकल्प बंद असल्याचे समजणे चुकीचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे एटापल्ली परिसरातील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असून, त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे. दुर्गम भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा हा प्रभावी नमुना ठरत आहे. स्थानिक स्तरावर उत्पादित मशरूमला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांमध्ये त्याची मागणी वाढत आहे.
दरम्यान, मशरूम उत्पादक महिला बचत गटांनीही प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले आहे. महिला सरस्वती बचत गटाच्या सदस्यांनी सांगितले की,
> “मशरूम विक्रीसाठी कोणतीही अडचण नसून आम्ही समाधानी आहोत.”
संताजी महिला बचत गटाने नमूद केले की,
> “गावात एकूण सहा मशरूम उत्पादक गट कार्यरत आहेत. आम्ही मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले असून उत्पादन सुरळीतपणे सुरू आहे.”
तसेच इतर मशरूम उत्पादक बचत गटांच्या सदस्यांनी सांगितले की,
> “मशरूम उत्पादन व्यवस्थित सुरू आहे. शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमची कोणतीही तक्रार नाही.”
या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांच्या सदस्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
> “आमच्या एटापल्लीतील ताज्या व गुणवत्तापूर्ण मशरूमला ग्राहकांनी प्राधान्य द्यावे. स्थानिक उत्पादनाला साथ दिल्यास आमच्या उपजीविकेला मोठा आधार मिळेल.”
नागरिकांनी या नाविन्यपूर्ण मशरूम उत्पादन उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
0000







