अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : तालुक्यातील मुख्य रस्त्यांची झालेली चाळण आणि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ एटापल्लीतील पत्रकारांनी आता थेट ‘आरपारची लढाई’ पुकारली आहे.९ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची दखल न घेतल्याने,आज १३ फेब्रुवारीपासून पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
*मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच रस्ते गायब?*
विशेष म्हणजे,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एटापल्लीला ‘स्टील हब’ म्हणून घोषित केले आहे.जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच असताना, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला याच तालुक्यातील रस्त्यांचा विसर पडला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.एका बाजूला औद्योगिक क्रांतीच्या घोषणा आणि दुसरीकडे खड्ड्यांमुळे नरकयातना भोगणारी जनता असे विदारक चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
*या मुख्य मार्गांची झाली आहे दुरवस्था:*
एटापल्ली – देवदा – गडचिरोली
एटापल्ली – जारावंडी
एटापल्ली – हेडरी – गट्टा
हे तिन्ही मार्ग सध्या मृत्यूचे सापळे बनले आहेत.
रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही,विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले आहे आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.दररोज होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
*लोकशाहीचा चौथा स्तंभ रस्त्यावर, प्रशासन सुस्त!*
गेल्या अनेक दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने निवेदन देऊनही शासनाने याची साधी दखल घेण्याचे सौजन्य दाखवले नाही.प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे पत्रकारांना लेखणी सोडून उपोषणाला बसावे लागले आहे. “लोकशाहीचा चौथा स्तंभ रस्त्यावर उतरलेला असतानाही प्रशासन झोपेत आहे का?” असा सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
या आंदोलनाला तालुक्यातील सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून आता प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
*आम्ही ९ तारखेपासून साखळी उपोषन करीत आहो,शासन,प्रशासनाने दखल न घेतल्यांने दिनांक १३ तारखेपासून १० पत्रकार आमरण उपोषन करीत आहे.जो पर्यत शासन,प्रशासनाकडुन लिखित मिळणार नाही तो पर्यत उपोषन सुरु राहणार यांची सर्वस्वी जबाबदार शासन,प्रशासनाची असेल.*
– रविंद्र रामगुंडेवार
तालुका अध्यक्ष,व्हाईस ऑफ मीडिया शाखा एटापल्ली
_________||||||___________
*महाराष्ट्र राज्यात गडचिरोली एकमात्र जिल्हा असा आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाकरण्याची बातम्या आम्ही खूप ऐकले आहे पण जेव्हा पासून सुरजागड खदान सुरु झाली तेव्हा पासुन मात्र गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद चक्क मुख्यमंत्री आपल्या जवळ ठेवतांना दोन वेळा दिसून आले तेवढ्यातच न थांबता चक्क सहपालकमंत्री पद निर्माण केले गेले पण ज्या तालुक्यातून हे जिल्ह्यात उत्पन्न वाडीचा खदान असलेल्या तालुक्यातील रस्ते मात्र गायब आहे हे लाजिरवाणी बाब आहे सत्ता करते तर मनमस्त पदाचे उपभोग घेत आहेत पण विरोधी पक्ष पण बघायच्या भूमिकेत असल्याने तालुक्यातील जनता हवालदिल झाली आहे म्हणून तालुका पत्रकार संघटनेने हे पाऊल उचलले आहे.*
-विनोद प्रेमसिंग चव्हाण
मुख्य सल्लागार







