अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली (हेडरी ): गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागात आरोग्यसेवेचा दर्जा झपाट्याने उंचावत असल्याचे प्रेरणादायी चित्र समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाने आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या बळावर दोन महत्त्वपूर्ण यश संपादन करत ग्रामीण आरोग्यसेवेत नवा आदर्श निर्माण केला आहे. रुग्णालयात प्रथमच ‘वेदनारहित सामान्य प्रसूती’ यशस्वीरित्या पार पडली असून, याचवेळी ४०० व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचा ऐतिहासिक टप्पाही गाठण्यात आला आहे.
ग्रामीण व दुर्गम भागात प्रसूतीदरम्यान महिलांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा धोकेही निर्माण होतात. मात्र, एलकेएएम रुग्णालयाने ‘एपिड्युरल अॅनेस्थेशिया’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही समस्या प्रभावीपणे दूर केली आहे. या प्रक्रियेमुळे प्रसूतीदरम्यान आईला वेदना जाणवत नाहीत, तरीही ती पूर्ण शुद्धीवर राहते. याशिवाय ‘वाय-फाय सक्षम CTG मॉनिटरिंग’ आणि ‘डिलेयड कॉर्ड क्लॅम्पिंग’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या पद्धतींचा अवलंब करून माता आणि बाळ दोघांच्याही सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले.
दरम्यान, रुग्णालयात पार पडलेली ४०० वी प्रसूती विशेष ठरली. गर्देवाडा येथील १९ वर्षीय सविता टोप्पो यांची गर्भधारणा उच्च-जोखीम स्वरूपाची असल्याने त्यांना गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तातडीने एलकेएएममध्ये दाखल करण्यात आले. परिस्थितीची गंभीरता ओळखून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तत्परतेने उपचार सुरू केले आणि १५ एप्रिल २०२६ रोजी सुरक्षितपणे बाळाचा जन्म घडवून आणला. या यशामुळे रुग्णालयाच्या सेवांवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या ‘सर्वांसाठी सुलभ व दर्जेदार आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका सौ. कीर्ती रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रुग्णांना केवळ उपचारच नव्हे, तर संवेदनशील आणि मानवतावादी सेवा दिली जाते. दुर्गम भागातील नागरिकांना मोफत व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरत आहे.
रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केलेल्या भावना लक्षवेधी आहेत. “हेडरीसारख्या दुर्गम भागात वेदनारहित प्रसूती आणि ४०० सुरक्षित जन्मांचा टप्पा गाठणे हे आमच्या समर्पित सेवाभावाचे प्रतीक आहे. आता आदिवासी भागातील मातांना उपचारासाठी शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही,” असे त्यांनी सांगितले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे अहेरी, एटापल्ली आणि भामरागड परिसरातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भारतातील मातृत्व सेवेला एक नवी दिशा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.







