आलदंडी टोला माता मृत्यू प्रकरणात रुग्णवाहिका वेळेवर : प्रशासनाचे स्पष्टीकरण उपचारासाठी पुजारी-वैदूकडे न जाता आरोग्य यंत्रणेकडेच जाण्याचे आवाहन

479

गडचिरोली, (जिमाका) दि. ३ :
एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील माता मृत्यू प्रकरणासंदर्भात काही माध्यमांमध्ये “रुग्णवाहिका न मिळाल्याने गरोदर मातेला सहा किलोमीटर पायी चालत जावे लागले आणि त्यातून तिचा मृत्यू झाला” असे वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी तोडसा परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली व संबंधितांशी सविस्तर चर्चा केली.

या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गरोदर माता ही आलदंडी टोला येथून उपचारासाठी किंवा रुग्णवाहिकेच्या अभावामुळे पायी चालत गेल्याची माहिती पूर्णतः चुकीची आहे. वास्तविक, संबंधित माता ही आलदंडी टोला येथून पेठा येथे एका पुजाऱ्याकडे गेली होती. त्या ठिकाणी तिने रात्री मुक्काम केला होता. दरम्यान, रात्री साधारण एक ते दोन वाजताच्या सुमारास तिला अचानक त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच स्थानिक आशा स्वयंसेविकेला तात्काळ संपर्क करण्यात आला.

आशा स्वयंसेविकेने कोणताही विलंब न करता तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. रुग्णवाहिकेद्वारे गरोदर मातेला हेडरी येथील लॉईड्स कालीअम्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे “सहा किलोमीटर पायी चालावे लागल्याने मृत्यू झाला” हा दावा पूर्णतः निराधार व वस्तुस्थितीला धरून नसल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

तसेच, सदर महिलेच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी गृहभेटी देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमितपणे तिच्या घरी भेट देऊन आवश्यक तपासण्या, आरोग्य स्थितीचे मूल्यमापन तसेच आवश्यक मार्गदर्शन केले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिक, आरोग्य यंत्रणा व संबंधित घटकांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, ग्रामीण व दुर्गम भागातील माता-बाल मृत्यू प्रकरणांबाबत प्रशासन अत्यंत संवेदनशील असून, कोणतीही घटना घडल्यास तिची सखोल चौकशी केली जाते. या प्रकरणात आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक ती तत्काळ सेवा पुरविण्यात आली असून, प्रशासनाकडून कोणतीही हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

याचबरोबर श्री. गाडे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करताना सांगितले की, गरोदर माता किंवा कोणत्याही गंभीर आजाराच्या परिस्थितीत पुजारी, वैदू किंवा अंधश्रद्धेवर आधारित उपचारांकडे न जाता थेट शासकीय आरोग्य यंत्रणेकडे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा स्वयंसेविका किंवा रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधावा. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यास अनेक जीव वाचू शकतात, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

या प्रकरणात पुजारीकडे जाणे, तेथे रात्री मुक्काम करणे आणि त्यानंतर अचानक प्रकृती बिघडणे, ही संपूर्ण घटना तपासणीअंती स्पष्ट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी व माध्यमांनी अपुऱ्या किंवा अप्रामाणिक माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग मातृ व बाल आरोग्याच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, दुर्गम भागातही रुग्णवाहिका सेवा, आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य यंत्रणा सतत कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००