तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न
अहेरी:विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उंचवावे,असे आवाहन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
अहेरी तालुका मुख्यालयातील कै. चंद्रभागाबाई मद्दीवार प्राथमिक शाळा येथे मंगळवार (९ जानेवारी) रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले,यावेळी उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रोजा करपेत,संवर्ग विकास अधिकारी राहुल वरठे,गोंडवाना विद्यापीठचे माजी प्राचार्य डॉ.विजय खोंडे, राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त जयश्री खोंडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऍड.अभय पाचपोर,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार,राकॉचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे, केंद्रप्रमुख उमेश चिलवेरवार, मुख्याध्यापक संतोष जोशी तसेच गटसमन्वयक ताराचंद भुरसे आणि साधनव्यक्ती उपस्थित होते.
पुढे बोलताना विज्ञानाच्या प्रगतीमुळे देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केली. गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यांनी प्रास्ताविकात शासनाचा प्रदर्शन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केले.
प्रदर्शनात तालुक्यातील उच्च प्राथमिक खुला गट, माध्यमिक खुला गट , आदिवासी गट, शैक्षणिक साहित्य गट, प्रयोगशाळा परिचर गट असे आदी गटातील मॉडेल्सची मांडणी करण्यात आली होती.मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल्सची पाहणी केली. तीन दिवस चालणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीचे शिक्षण विभाग आणि कै.चंद्रभागाबाई मद्दीवार शाळेतील शिक्षकांनी योग्य नियोजन केले होते.तालुक्यातील विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या.